निर्वासितांना आश्रय का द्यायचा?   

भारत धर्मशाळा नाही...

नवी दिल्ली : जगभरातून आलेल्या निर्वासितांना आश्रय द्यायला भारत धर्मशाळा नाही. आम्ही आधीच १४० कोटी नागरिक संघर्ष करत आहोत. प्रत्येक कोपर्‍यातून आलेल्या निर्वासितांना आश्रय देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी श्रीलंकेहून तामिळ निर्वासिताला अटक केल्याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देताना ही टिप्पणी केली.  
 
एका निर्वासित व्यक्तीच्या जिवाला श्रीलंकेत धोका असल्याने त्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती संबंधिताच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, तुम्हाला येथे स्थायिक होण्याचा काय अधिकार आहे ? स्वतःच्या देशात तुमचा जीव धोक्यात असेल तर दुसर्‍या देशात जा, असे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी अर्जकर्त्यांच्या वकिलाला खडसावले. 
 
अर्जकर्ता हा श्रीलंकन तामिळ असून तो व्हिसा घेऊन भारतात आला होता. २०१५ मध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमशी संबंध असल्याच्या संशयावरून श्रीलंकेत त्याला अटक करण्यात आली होती. एलटीटीईही पूर्वी श्रीलंकेत सक्रिय असलेली एक दहशतवादी संघटना होती. २०१८ मध्ये त्याला बेकायदा क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 
 

Related Articles